Tuesday, July 14, 2026

शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

 



शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न



दि. १४ जुलै २०२६


आज दि. १४ जुलै २०२६ रोजी शिक्षकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांच्या दालनात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.


या बैठकीस शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, मा. श्री. विक्रम काळे व मा. श्री. सुधाकर अडबाळे उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:


१) पदोन्नतीबाबत :


शालेय शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय प्राप्त झाला असून त्यानुसार शालेय शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे.


नागपूर खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या तारखेपर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेले सर्व सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र राहतील, अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.


कोल्हापूर खंडपीठाचा निर्णयही प्राप्त झाला असून त्याचाही विचार करून शासन अंतिम निर्णय घेणार आहे.


२) TET परीक्षेबाबत :


महाराष्ट्र शासन कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा आयोजित करणार आहे.


३) यापूर्वी झालेल्या पदोन्नतीबाबत :


यापूर्वी झालेल्या सर्व पदोन्नती प्रकरणांबाबत न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून शासन योग्य निर्णय घेणार आहे.


४) एक दिवसाच्या पगार कपातीबाबत :


एकदिवसीय धरणे आंदोलनामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची भरपाई अतिरिक्त अध्यापनाद्वारे करण्यात येणार असल्याने कोणत्याही शिक्षकाचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात येणार नाही, याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.


५) पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी :


पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून शासन निर्णय घेणार आहे.


६) आंतरजिल्हा बदली :


पवित्र पोर्टलमधून नियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीपूर्वी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी संघटनांची मागणी करण्यात आली.


SIR चे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शालेय शिक्षण व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री महोदयांनी सांगितले.


७) BLO / SIR कामकाज :


BLO व SIR कामादरम्यान काही अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी, तसेच शिक्षकांना होत असलेल्या त्रासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


या संदर्भात मा. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत बावनकुळे, निवडणूक आयोग आणि शिक्षक आमदार यांच्या उपस्थितीत पुढील मंगळवारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यक निर्णय घेतले जातील.


शिक्षकांना BLO/SIR ची कामे देऊ नयेत, या भूमिकेवर सर्व शिक्षक संघटना ठाम असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.


*सदर बैठकीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त सचिव श्रीकृष्ण चिकणे  तसेच रायगड जिल्हा सरचिटणीस  विनोद जोशी यांची उपस्थिती होती..*

Wednesday, July 8, 2026

प्रा. अरुण दोदे (भाईसाहेब) प्राथमिक शिक्षकांचे स्फूर्तीस्थान







 प्रा. अरुण दोदे (भाईसाहेब) प्राथमिक शिक्षकांचे स्फूर्तीस्थान


आज ९ जुलै २०२६ रोजी आपले प्राणप्रिय नेते शिक्षक नायक स्वर्गीय प्रा अरुण दोंदे यांचा २५ वा स्मृतिदिन

या स्मृतीदिनी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या वतीने विनम्र अभिवादन!!

आपल्या कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातीलय नव्हे तर देशभरातील प्राथमिक शिक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारा नेता व आपल्या कार्यकौशल्याचा ठसा जागतिक स्तरावर उमटवणारा शिक्षक नेता स्वर्गीय अरुणभाई असामान्य बुध्दिमता लाभलेले अलौकिक व्यक्तीमत्व होते. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांचा शिक्षक न राहता ती समाजाचाही शिक्षक व्हावा ही त्यांची शिक्षकांकडून अपेक्षा होती.

शैक्षणिक कार्य: ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धार्थ महाविद्यालयात  अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. पुढे ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य बनले आणि त्यांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'चे  सदस्य व उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.


संघटनात्मक कामाचा वारसा जरी पिढीजात मिळाला असला तरी स्वतःचे कार्यकर्तृत्व, कठीण परिश्रम, अमोघ वक्तृत्व, अभ्यासूपणाच्या जोरावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जागतिक शिक्षक संघात उमटवला. के. प्रा. अरुण दोंदे यांचे भाषण म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य देणारं असायच. आपल्या अमोघ वक्तृत्वाने शिक्षकांचे ते नेते झाले. आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कौशल्य यामुळे राजदरबारीही त्यांचा मोठा मान होता


जसे शिक्षक त्यांच्या भाषणाचे चाहते होते तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकही. जागतिक शिक्षक संघटनांच्या अनेक शिक्षण परिषदेसाठी त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. जवळपास २८ देशांना भेटी दिल्या या शिक्षण परिषदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आजही आवर्जून उल्लेख होतो. भारत सरकारच्या रशिया येथील शैक्षणिक दौऱ्याचे नेतृत्व अरुणभाई यांनी केले होते.


७ ऑक्टोबर १९६२ ला दादासाहेबांचे निधन झाल्यानंतर वयाच्या २९ व्या वर्षी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेची आणि पर्यायाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची धुरा भाईसाहेबांच्या खांद्यावर येवून पडली. सन १९६३ सालीच शिक्षकांना पेन्शन योजना मंजूर करून घेतली. सन १९६८ साली मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरावरील शिक्षण मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. त्यासाठी भाईसाहेबानी आपले संघटन कौशल्याचा वापर केला वेतन आयोग लागू करण्यापूर्वी शिक्षक संघटनेची साक्ष घेतली जावी व आजपर्यंत केवळ अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ हाच वेतन आयोगासमोर प्राथमिक शिक्षकांची संघटना म्हणून साक्ष देत आला आहे.


प्राथमिक शिक्षकाचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्याच्या जीवात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी भाईसाहेबानी आपले उभे आयुष्य पणाला लावले प्राथमिक शिक्षकांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी स्वः पंतप्रयान श्रीम इंदिरा गांधी यांच्याकडे अभ्यासपूर्ण मागणी करून चटोपाध्याय आयोगाची स्थापना करण्यात व चटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतन संरचना तयार करण्यासाठी भाईसाहेबांनी केलेले काम भारतातील प्राथमिक शिक्षक कधीही विसरु शकणार नाहीत शाळांसाठी ४ टक्के सादील अनुदान मिळावे म्हणून केलेल्या 'राष्ट्रपतींना तार पाठवण्याच्या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली व शाळांना ४ टक्के सादील अनुदान मिळू लागले. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या कारकिर्दीत त्यांनी सोडवले


स्वर्गीय अरुणभाईंनी महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे नेतेपद हायात भूषविले तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे तीनवेळा (टर्म) अध्यक्षपद भूषविले व पुढे संरक्षक म्हणून होते आपल्या पदाचा अभ्यासू वृत्तीचा व वक्तृत्वाचा वापर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला महाराष्ट्रासह भारतातील खेड्या-पाड्यापर्यंत प्रवास करुन प्राथमिक शिक्षकांचे संगठन त्यांनी मजबूत केले.


प्राथमिक शिक्षक ही एक व्यक्ती नसून प्रचंड अशी शक्ती आहे. याची जाणीव त्यांनी शिक्षकांना करुन दिली विविध शिक्षण आयोगासमोर शिक्षक, विद्यार्थी व शाळासंबंधीचे प्रश्न मांडले. प्राथमिक शिक्षणासाठी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद करावी ही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर सुट्टया कमी करुन कामाचे तास वाढवा अशी मागणी करणारा संघटनेचा भाईसाहेबांसारखा नेता दूर्मिळच म्हणावा लागेल.


संघटनेचा पदाधिकारी हा आधी विद्यार्थ्यांचा शिक्षक आहे, म्हणून विद्यार्थी टिकला तर शाळा टिकतील व शाळा टिकल्या तर शिक्षक टिकतील. म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. असा उपदेश ते भाषणातून नेहमी देत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध पदे त्यांनी भूषवली व स्वकर्तृत्वाने व स्वपरिश्रमाने पदाची शान उन्नत ठेवली. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे नेते, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व संरक्षक, सार्क शिक्षक संघाच्या विविध समित्यांवर सदस्य, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, एस.एस.सी बोर्डाचे सदस्य, गोखले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य, एन.सी.ई.आर.टी. चे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषवली सन १९७६ साली विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्याची निवड झाली. परंतु सत्ता व पदाचा मोह मात्र त्यांनी कधी ठेवला नाही.


भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शिक्षकांचे एक हक्काचे शिक्षक भवन असावे हे भाईसाहेबांचे स्वप्न होते. त्याचा ध्यास त्यानी घेतला होता. भाईसाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या श्रीम सुलभाताई दोंदे यानी खूप प्रयत्न केले व करत आहेत. आज अखिल महाराष्ट्राचे शानदार पोर्टेबल कार्यालय या जागेत सुरु झाले. माईसाहेबांच्या श्वासाची माळ तुटली पण ध्यासाची माळ ताईसाहेबांनी कधीही तुटू दिली नाही. त्याच्या पश्चात महाराष्ट्रातील शिक्षकांचा आधार बनल्या आहेत. त्यांचे कार्य जोमाने पुढे ठेवले आहे. आज शिक्षकांच्या प्रत्येक लढ्यात व प्रत्येक प्रश्नात स्वतःला झोकून देवून अहोरात्र परिश्रम करीत आहेत. त्याग करीत राहिल्याने जीवनास मोल प्राप्त होते ही शिकवण दोदे घराण्याने आपल्या आचरणातून समाजापुढे ठेवली.


भाईसाहेबांच्या जीवनावर लिहिण्यासारखे खूप आहे. कारण त्यांचं कर्तृत्व विशाल आहे तरीसुध्दा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न... ९ जुलै २००१ रोजी आकस्मात माईसाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु, प्राथमिक शिक्षकांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरकाल राहतील, त्यांचा स्मृतीदिन हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी स्फूर्तीदिन ठरावा हीच सदिच्छा! व आपल्या लाडक्या नेत्याला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

श्रेष्ठ दान ...रक्तदान

 





श्रेष्ठ दान ...रक्तदान 

आदरणीय बापूंनी काल आपल्या वाढदिवशी 59 व्या वेळा रक्तदान केलं. एका शिक्षकाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे.संघटना, कुटुंब,अध्यापन या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत समाजासाठी स्वतः च्या कृतीने आदर्श निर्माण केला आहे.


अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा दातृत्वाचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव,श्री विजय भुजबळ, उपाध्यक्ष, बसवराज दोडमनी सरचिटणीस,राजेंद्र भुजबळ, देवेंद्र भुजबळ,अनिकेत भुजबळ,श्री.सावंत,श्री.भिंगारदेवे,श्री हणमंत नलावडे.व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन


 टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन



अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सातारा जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या टीईटी सक्तीच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.


संघटनेने निवेदनाद्वारे आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या सक्तीमधून कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी केली. तसेच टीईटी परीक्षेतील किमान पात्रता गुणांची अट ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली.


संघटनेच्या मते, आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी राज्य शासनाच्या नियमानुसार नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन कार्य केले असून, नव्या अटींची पूर्वलक्षी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांच्या सेवासातत्यावर व भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी टीईटी सक्तीच्या विषयावर वैयक्तिक चर्चा करून शिक्षकांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.


या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष श्री दीपक भुजबळ, राज्य संघटक श्री संतोष लोहार, जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव, उपाध्यक्ष श्री विजय भुजबळ, जिल्हा सरचिटणीस श्री बसवराज दोडमनी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

९ जुलै रोजीच्या 'शाळा बंद' आंदोलनात सक्रिय सहभागाबाबत

 प्रति,

*सर्व राज्य पदाधिकारी / जिल्हा / नपा संघ अध्यक्ष / सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


*​विषय: ९ जुलै रोजीच्या 'शाळा बंद' आंदोलनात सक्रिय सहभागाबाबत ..*

​महोदय 

सस्नेह नमस्कार.

*​वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, टीईटी (TET), पदोन्नती, संचमान्यता आणि शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक कामे या अत्यंत महत्त्वाच्या व प्रलंबित मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती संघटनेने ९ जुलै रोजी 'शाळा बंद' ची हाक दिली आहे.*


*​या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होत आहे, याचे अधिकृत पत्र यापूर्वीच आपणास निर्गमित करण्यात आले आहे.*

*​आंदोलनात सहभाग:* आपल्या जिल्ह्यातील स्थानिक नियोजनानुसार सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे व सक्रिय सहभागी व्हावे.

*​आंदोलनाचे स्वरूप:* शासनाचे सध्याचे धोरण हे शाळा आणि शिक्षण विरोधी आहे. सरकारी शाळा वाचवण्यासाठी आणि शिक्षकांवरील अन्यायाचा तीव्र निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा / धरणे आंदोलन आयोजित करून आपला रोष व्यक्त करावा.

*आवाहन*

 जिल्हा, तालुका आणि केंद्र पातळीवरील प्रत्येक शिक्षकांपर्यंत हा संदेश पोहोचवून आंदोलन शंभर टक्के यशस्वी करावे.

​📢 "सरकारी शाळा वाचवण्यासाठी आणि आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या, ९ जुलैचे आंदोलन यशस्वी करा!"

​आपले नम्र,

​(अध्यक्ष / सरचिटणीस)

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, June 22, 2026

TET प्रश्नी लक्षवेधी आंदोलन करणार

 






*संघशक्ती युगे युगे!!*

▪️▪️▪️▪️▪️▪️


*🟣टिईटी प्रश्नी लक्षवेधी आंदोलन करणार..*🟣

*🟥अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचा निर्णय*


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*☸️अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची आँनलाइन सभा रविवार दि.२१जून रोजी राज्य अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.टिईटी न्यायालयीन निर्णयाने उद्भवलेल्या सेवारत शिक्षकांच्या सेवा व पदोन्नती प्रश्नी चर्चा होऊन संघटनेने "लक्षवेधी "आंदोलन  करण्याचा निर्णय घेतला आहे .*

*याबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने घेतलेल्या निर्णयानुसार भारतातील २४ राज्यात हे आंदोलन होणार आहे .*

 *📍अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने'  देशाचे शिक्षणमंत्री मा.धर्मेद्र प्रधान, एनसीटीई चे अध्यक्ष तसेच विविध मंत्री यांची भेट घेवून निवेदन दिले .तसेच टिईटी प्रश्नी पुन्हा आंदोलनाची हाक दिली.सन २०१० पुर्वीच्या शिक्षकांना टिईटी  तून सवलत मिळावी यासाठी संसदेत कायद्यात दुरुस्ती करावी यासाठी जिल्हा/राज्य तसेच देशस्तरापर्यत आंदोलन करण्याचे ठरले आहे.त्याप्रमाणे राज्यात टिईटी प्रश्नी लक्षवेधी आंदोलन करण्याचे ठरले.*

*🟣आंदोलनाचे स्वरुप*

 *टीईटी बाबत  करावयाच्या आंदोलनाची दिशा  ठरवण्यात आली.*

 *🟣जुलै पहिल्या आठवड्यापर्यत मा.राज्य सभा व लोकसभेचे खासदार यांना निवेदनदेणे व शिक्षकांच्या प्रश्नी संसदेत आवाज उठविण्याचे आवाहन करणे.*


*🟣विधान सभा /विधानपरिषद सदस्य यांना निवेदन देणे सेवारत शिक्षकांना टिईटी गुणात सवलत, विभागीय परिक्षेचे आयोजन, परिक्षेची काठिण्य पातळी कमी करणे याबाबत पावसाळी अधिवेशनात चर्चा करून निर्णय घेणेबाबत विनंती करणे.*


*🟣धरणे आंदोलन:११जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , मा.शिक्षणमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येईल.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*सदर सभेस सर्व राज्य संघ पदाधिकारी जिल्हा संघ अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Tuesday, June 9, 2026

जनगणना संदर्भात निवेदन...





अखिल सातारा शिक्षक संघाच्या वतीने जनगणनेसंबंधाने जिल्हाधिका-यांना निवेदन....

         सध्या सुरु असलेल्या भारताची जनगणना २०२६ - २०२७ च्या अनुषंगाने अखिल सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी सातारा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने जनगणनेच्या कर्तव्यावर असणा-या प्रगणक व पर्यवेक्षकांना माहे मे व जून महिन्याचा प्रवासभत्ता अदा करण्यात यावा.तसेच जनगणना कर्तव्यावर असताना एखाद्या कर्मचा-याचा अपघात झाल्यास,अपघाती मृत्यू झाल्यास ₹ ५० लाखांचे विमा संरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे,तसेच प्रगणक व पर्यवेक्षकांना किमान ६० दिवसांची अर्जित रजा सेवापुस्तकात जमा करावी,जनगणनेचे काम करत असताना प्रगणकांना काही अडचण निर्माण झाल्यास 'तात्काळ मदत कक्ष' निर्माण करावा व त्याचा संपर्क क्रमांक सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना देण्यात यावा तसेच जनगणनेचे राष्ट्रीय काम सुट्टीच्या काळात पूर्ण केल्याबद्दल सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना मा.जिल्हाधिकारी यांचे सहीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे.अशा विविध मागण्यांचे निवेदन सन्माननीय जिल्हाधिकारी यांचे वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मा.नागेश पाटील यांनी स्वीकारले व सर्व मागण्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

      यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख दीपक भुजबळ, राज्य संघटक संतोष लोहार, रजनी चव्हाण ,अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश जाधव,सरचिटणीस बसवराज दोडमणी उपाध्यक्ष विजयकुमार भुजबळ, सुशांत येवले,उपसरचिटणीस उद्धव पवार, कार्याध्यक्ष कृष्णात हिरवळे, महिला आघाडी प्रमुख प्रणिता देवकर, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन तथा विद्यमान संचालक संजीवन जगदाळे,कराड पाटण सोसायटीचे संचालक संतोष यादव,

पाटणचे शिक्षक नेते राजू पवार आदी शिक्षक उपस्थित होते.

शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

  शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न दि. १४ जुलै २०२६ आज दि. १४ जुलै २०२...