Monday, October 7, 2024

मो.वा उर्फ दादासाहेब दोंदे

 

 




आज ७ ऑक्टोबर........

शिक्षकांचे पंचप्राण कै.मो.वा उर्फ दादासाहेब दोंदे यांची पुण्यतिथी....

प्राध्यापक गंगाधर आहिरे सर यांनी

 दादासाहेब तथा आचार्य मो. वा. दोंदे यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅


   २० व्या शतकातील प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्रातील अनेक शिलेदार अधोरेखित आहेत. आचार्य मो. वा. दोंदे हे त्यापैकीच एक. त्यांचे संपूर्ण नांव मोरेश्वर वासुदेव दोंदे.दादासाहेब या आदरयुक्त उपाधीने ते परिचित राहिलेले आहेत. समाज उन्नतीच्या ध्यासातून त्यांनी हयातभर समाजकार्य केलं. ते मुळचे ठाणे जिल्ह्यातील. ४ ऑगस्ट १८९४ ही त्यांची जन्म तारीख. विल्सन काँलेजमधून १९१५ साली, त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. तळागाळातील माणसांपर्यत शिक्षण प्रवाहीत व्हावे, त्यातून सुजाण नागरिक घडावे ही त्यांची मनोधारणा होती. नामदार गोपाळ क्रुष्ण गोखले यांंची विचारश्रुष्टी व प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अथक कर्तृत्वातून, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापन झालेली होती. त्या संस्थेच्या मुंबईतील परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये आचार्य दोंदे यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. १९२८ ते १९५४ या काळात त्यांनी उपरोक्त शाळेत प्राचार्यपद उपक्रमशीलतेनं सांभाळलं. गो.ए. सोसायटीच्या विविधांगी शैक्षणिक कार्यात त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिलेलं होतं.


    आचार्य दोंदे सर हे तत्कालीन महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध समस्यांशी कर्तव्यभावनेनं जोडलेले होते. १९४५ साली त्यांनी भारतीय स्तरावर तमाम प्राथमिक शिक्षकांची संघटना उभारली. त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी, त्यांनी शिक्षकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला होता. संपाच्या परिणामातून शिक्षकांच्या मुलभूत मागण्यांंची दखल, स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीतील सरकारला घ्यावी लागलेली होती. त्या शिक्षक संघटनेची पहिली मागणी होती, शिक्षकांचा पगार हा १५ रुपयावरून ३० रुपये झाला पाहिजे. ती मागणी तत्कालीन सरकारला मान्य करावी लागली होती. शिक्षकीपेशा आणि शिक्षणकुळाशी, ते समर्पित व्रुतीने तादात्म्य पावलेले होते. त्यांनी अव्याहतपणे शैक्षणिक कार्यात स्वताला झोकून दिलेलं होतं. सेवानिव्रूतीच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेलं उत्पन्नही, त्यांनी विविध शाळांना दान म्हणून दिलेलं होतं. उपरोक्त नोंंदी त्यांच्या संदर्भातील लिखितात उपलब्ध आहे.


    आचार्य दोंदे यांचे १९३० ते ६४ या कालावधीतील सार्वजनिक क्षेत्रातील कर्तुत्व, आजच्या वर्तमानातही प्रेरक ठरणारं आहे. ते नव्या आचार- विचारांचे धुरीण होते. परिणामी त्यांची तत्कालीन समाज बदलाच्या जडणघडणीत, सामीलकी राहिल्याचे निदर्शनास येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीचे ते क्रुतीशील समर्थक होते. त्यातून द्वयींंचेे कौटुंबिक संबंंध द्रुढ झालेले होते. त्यातूनच बासाहेबांनी आपला मुलगा यशवंत तथा भैय्यासाहेब यांस, दोंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. भट हायस्कूलमध्ये प्रविष्ट केलेलं होतं. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या 'स्वतंत्र मजूर पक्षात' आणि शैक्षणिक व कामगार चळवळीतही त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिल्याचे दिसून येते. आचार्य दोंदे सर, हे प्रभावी वक्ते होते. त्यांचे विवेचन चिंतनगर्भ असे. १९४२ साली डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला होता. त्या समारंभाचे अध्यक्षस्थान दोंदे सरांनी भुषविले होते. "डॉ. आंबेडकरांचे संर्घशमय कार्य हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्वपुर्ण ठरते आहे." असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. १९४८ साली त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या सुविद्य सहचारिणी, सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ आर. एम. भट. हायस्कूलमध्ये घडवून आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुुंबईतील 'राजग्रुह' हे निवासस्थान त्यांच्या हजारो दुर्मिळ ग्रथांचे माहेरघर होतं. त्या ग्रंथालयातील पंचवीस हजार ग्रंथांची क्रमवार सूची तयार करण्यात, दोंदे सरांचा मोलाचा सहभाग राहिलेला होता. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या 'पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे' देखील ते विश्वत होते. प्रस्तुत संस्थेेच्या विकासात त्यांची कामगिरी मोलाची ठरलेेेली होती. १४ आँक्टोंबर १९५६ रोजी, बाबासाहेबांनी बुद्धधम्माची नागपुरात दिक्षा स्वीकारली. त्या धर्मांतराचे समर्थन व स्वागत करणारे पत्र, दोंंदे सरांंनी बाबासाहेेबांंना पाठविलेे होतेे.


 ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. ७ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर आंदरांजली सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड, प्र. के. अत्रे आणि आचार्य दोंदे यांसह काही मोजक्याच धुरीणांची शोक प्रकट करणारी भाषणं, सदर सभेत झाली होती. त्यावेळी आचार्यांनी अत्यंत भावोत्कट असं मनोगत व्यक्त केलेलं होतं. प्रस्तुत मनोगतातून त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला होता.


   आचार्य दोंदे सर, राजकीय व्यवस्थेकडे सामाजिक सुधारणा करण्याचे माध्यम म्हणून पाहात होते. त्या दृष्टीतून ते राजकारणात सक्रिय होते. त्यांचा लोकसंग्रह अधिक असल्याने ते मुंबई महानगरपालिकेचे अनेक वर्षे सदस्य होते. १९५७-५८ साली ते महापौरपदीही विराजमान झालेले होते. त्यांच्या त्या कार्किदीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केलेलं होतं. निस्पृह प्रबोधनकार, आदर्शवत आणि त्यागशील व्रुतीचे शिक्षक, निस्वार्थी राजकारणी व मानवतेचा कैवार क्रुतीशीलतेनं जपणारा एक 'सत्शील माणूस' असे विविध पैलू; आचार्याच्या व्यक्तित्वात सामावलेले होते. या कर्तबगार सुधारकाचे १९६४ साली अकाली निधन झाले. वर्तमानात समाज, शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रांत, क्रुतीप्रवण असलेल्या उदयोन्मुख मुखंडांना; आचार्य दोंदे सरांचे जीवन व कर्तृत्व मार्गदीप ठरु शकते.

🙏🙏🙏.,.......

No comments:

Post a Comment

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

 *संघ शक्ती युगे युगे !!!* *🔴अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ....*🟡 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *➡️हिंगोली अखिल...