प्रा. अरुण दोदे (भाईसाहेब) प्राथमिक शिक्षकांचे स्फूर्तीस्थान
आज ९ जुलै २०२६ रोजी आपले प्राणप्रिय नेते शिक्षक नायक स्वर्गीय प्रा अरुण दोंदे यांचा २५ वा स्मृतिदिन
या स्मृतीदिनी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या वतीने विनम्र अभिवादन!!
आपल्या कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातीलय नव्हे तर देशभरातील प्राथमिक शिक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारा नेता व आपल्या कार्यकौशल्याचा ठसा जागतिक स्तरावर उमटवणारा शिक्षक नेता स्वर्गीय अरुणभाई असामान्य बुध्दिमता लाभलेले अलौकिक व्यक्तीमत्व होते. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांचा शिक्षक न राहता ती समाजाचाही शिक्षक व्हावा ही त्यांची शिक्षकांकडून अपेक्षा होती.
शैक्षणिक कार्य: ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धार्थ महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. पुढे ते याच महाविद्यालयाचे प्राचार्य बनले आणि त्यांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'चे सदस्य व उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
संघटनात्मक कामाचा वारसा जरी पिढीजात मिळाला असला तरी स्वतःचे कार्यकर्तृत्व, कठीण परिश्रम, अमोघ वक्तृत्व, अभ्यासूपणाच्या जोरावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जागतिक शिक्षक संघात उमटवला. के. प्रा. अरुण दोंदे यांचे भाषण म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य देणारं असायच. आपल्या अमोघ वक्तृत्वाने शिक्षकांचे ते नेते झाले. आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कौशल्य यामुळे राजदरबारीही त्यांचा मोठा मान होता
जसे शिक्षक त्यांच्या भाषणाचे चाहते होते तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकही. जागतिक शिक्षक संघटनांच्या अनेक शिक्षण परिषदेसाठी त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. जवळपास २८ देशांना भेटी दिल्या या शिक्षण परिषदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आजही आवर्जून उल्लेख होतो. भारत सरकारच्या रशिया येथील शैक्षणिक दौऱ्याचे नेतृत्व अरुणभाई यांनी केले होते.
७ ऑक्टोबर १९६२ ला दादासाहेबांचे निधन झाल्यानंतर वयाच्या २९ व्या वर्षी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेची आणि पर्यायाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची धुरा भाईसाहेबांच्या खांद्यावर येवून पडली. सन १९६३ सालीच शिक्षकांना पेन्शन योजना मंजूर करून घेतली. सन १९६८ साली मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरावरील शिक्षण मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला. त्यासाठी भाईसाहेबानी आपले संघटन कौशल्याचा वापर केला वेतन आयोग लागू करण्यापूर्वी शिक्षक संघटनेची साक्ष घेतली जावी व आजपर्यंत केवळ अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ हाच वेतन आयोगासमोर प्राथमिक शिक्षकांची संघटना म्हणून साक्ष देत आला आहे.
प्राथमिक शिक्षकाचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्याच्या जीवात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी भाईसाहेबानी आपले उभे आयुष्य पणाला लावले प्राथमिक शिक्षकांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी स्वः पंतप्रयान श्रीम इंदिरा गांधी यांच्याकडे अभ्यासपूर्ण मागणी करून चटोपाध्याय आयोगाची स्थापना करण्यात व चटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतन संरचना तयार करण्यासाठी भाईसाहेबांनी केलेले काम भारतातील प्राथमिक शिक्षक कधीही विसरु शकणार नाहीत शाळांसाठी ४ टक्के सादील अनुदान मिळावे म्हणून केलेल्या 'राष्ट्रपतींना तार पाठवण्याच्या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली व शाळांना ४ टक्के सादील अनुदान मिळू लागले. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या कारकिर्दीत त्यांनी सोडवले
स्वर्गीय अरुणभाईंनी महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे नेतेपद हायात भूषविले तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे तीनवेळा (टर्म) अध्यक्षपद भूषविले व पुढे संरक्षक म्हणून होते आपल्या पदाचा अभ्यासू वृत्तीचा व वक्तृत्वाचा वापर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला महाराष्ट्रासह भारतातील खेड्या-पाड्यापर्यंत प्रवास करुन प्राथमिक शिक्षकांचे संगठन त्यांनी मजबूत केले.
प्राथमिक शिक्षक ही एक व्यक्ती नसून प्रचंड अशी शक्ती आहे. याची जाणीव त्यांनी शिक्षकांना करुन दिली विविध शिक्षण आयोगासमोर शिक्षक, विद्यार्थी व शाळासंबंधीचे प्रश्न मांडले. प्राथमिक शिक्षणासाठी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद करावी ही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर सुट्टया कमी करुन कामाचे तास वाढवा अशी मागणी करणारा संघटनेचा भाईसाहेबांसारखा नेता दूर्मिळच म्हणावा लागेल.
संघटनेचा पदाधिकारी हा आधी विद्यार्थ्यांचा शिक्षक आहे, म्हणून विद्यार्थी टिकला तर शाळा टिकतील व शाळा टिकल्या तर शिक्षक टिकतील. म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. असा उपदेश ते भाषणातून नेहमी देत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध पदे त्यांनी भूषवली व स्वकर्तृत्वाने व स्वपरिश्रमाने पदाची शान उन्नत ठेवली. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे नेते, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व संरक्षक, सार्क शिक्षक संघाच्या विविध समित्यांवर सदस्य, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, एस.एस.सी बोर्डाचे सदस्य, गोखले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य, एन.सी.ई.आर.टी. चे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषवली सन १९७६ साली विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्याची निवड झाली. परंतु सत्ता व पदाचा मोह मात्र त्यांनी कधी ठेवला नाही.
भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शिक्षकांचे एक हक्काचे शिक्षक भवन असावे हे भाईसाहेबांचे स्वप्न होते. त्याचा ध्यास त्यानी घेतला होता. भाईसाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या श्रीम सुलभाताई दोंदे यानी खूप प्रयत्न केले व करत आहेत. आज अखिल महाराष्ट्राचे शानदार पोर्टेबल कार्यालय या जागेत सुरु झाले. माईसाहेबांच्या श्वासाची माळ तुटली पण ध्यासाची माळ ताईसाहेबांनी कधीही तुटू दिली नाही. त्याच्या पश्चात महाराष्ट्रातील शिक्षकांचा आधार बनल्या आहेत. त्यांचे कार्य जोमाने पुढे ठेवले आहे. आज शिक्षकांच्या प्रत्येक लढ्यात व प्रत्येक प्रश्नात स्वतःला झोकून देवून अहोरात्र परिश्रम करीत आहेत. त्याग करीत राहिल्याने जीवनास मोल प्राप्त होते ही शिकवण दोदे घराण्याने आपल्या आचरणातून समाजापुढे ठेवली.
भाईसाहेबांच्या जीवनावर लिहिण्यासारखे खूप आहे. कारण त्यांचं कर्तृत्व विशाल आहे तरीसुध्दा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न... ९ जुलै २००१ रोजी आकस्मात माईसाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु, प्राथमिक शिक्षकांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरकाल राहतील, त्यांचा स्मृतीदिन हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी स्फूर्तीदिन ठरावा हीच सदिच्छा! व आपल्या लाडक्या नेत्याला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

No comments:
Post a Comment