*आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे*
२० व्या शतकातील प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्रातील अनेक शिलेदार अधोरेखित आहेत. आचार्य मो. वा. दोंदे हे त्यापैकीच एक. त्यांचे संपूर्ण नांव मोरेश्वर वासुदेव दोंदे. *दादासाहेब* या आदरयुक्त उपाधीने ते परिचित राहिलेले आहेत. ते मुळचे ठाणे जिल्ह्यातील.४ आँगस्ट १८९४ ही त्यांची जन्म तारीख. विल्सन काँलेजमधून १९१५ साली, त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. नामदार गोपाळ क्रुष्ण गोखले यांंची विचारश्रुष्टी व प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अथक कर्तृत्वातून, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापन झालेली होती. त्या संस्थेच्या मुंबईतील परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये आचार्य दोंदे यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. १९२८ ते १९५४ या काळात त्यांनी उपरोक्त शाळेत प्राचार्यपद सांभाळलं.
मोरेश्वर यांचे ना.म.जोशी यांच्या समाज सेवा संघाच्या कार्यालयात नेहमी जाणेयेणे असे. बाबासाहेबही जोशींच्या कार्यालयात कधीकधी जात असत. त्याच कार्यालयात मोरेश्वर यांची बाबासाहेबांशी भेट झाली. गांधीजींच्या दलितोध्दाराच्या संकल्पनांपेक्षा बाबासाहेबांची ध्येयधोरणं आणि विचार प्रभावी व ठोस असल्याचे मोरेश्वर यांना जाणवले.मोरेश्वर बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले. दलितोध्दारासाठी गांधीजींचा हरिजनोध्दाराचा मार्ग कुचकामी व बेगडी असल्याचे मोरेश्वर यांची पक्की खात्री झाली. ते गांधीजींपासून, त्यांच्या विचारांपासून आणि पर्यायाने काँग्रेसपासून राजकीयदृष्ट्या बाजूला होऊ लागले. त्यांच्या मनावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा बसू लागला. ते काँग्रेस पक्षापासून १९२८ साली कायमचे व पूर्णतः अलिप्त झाले. आता ते जनमानसात ' *दादासाहेब* ' म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले होते.
कधी समाज सेवा संघाच्या कार्यालयात, तर कधी बाबासाहेबांच्या कार्यालयात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, अनंतराव चित्रे, भास्करराव कद्रेकर, कमलाकांत चित्रे, दत्तात्रय प्रधान, रामचंद्र कवळी आणि दादासाहेब दोंदे यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक गप्पा होऊ लागल्या.
एव्हाना बाबासाहेब आणि दादासाहेब यांचे संबंध खूपच दृढ झाले होते. त्या दोघांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी शिक्षक संघटना १९१० साली स्थापना झाली .त्याकाळी स्वातंत्र्य चळवळ उभारणे हा एकमेव हेतू होता .मुंबई इलाखा प्राथमिक शिक्षक संघ नावाने संघटनेची स्थापना झाली होती.
सन १९४५ ला मुंबई राज्य प्राथमिक शिक्षक संघ अशी पुनर्रचना करण्यात आली,व पहिंले अधिवेशन पुणे येथे घेण्यात आले ,अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक आचार्य दादासाहेब उर्फ मो.वा.दोंदे हे होते.पहिली मागणी शिक्षकांचा पगार १५ रु.वरुन ३० रु.करणे त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी, त्यांनी शिक्षकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला होता.कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांची साथ संपाला लाभली. संपाच्या परिणामातून शिक्षकांच्या मुलभूत मागण्यांंची दखल, स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीतील सरकारला घ्यावी लागलेली होती. त्यांनी अव्याहतपणे शैक्षणिक कार्यात स्वताला झोकून दिलेलं होतं. सेवानिव्रूतीच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेलं उत्पन्नही, त्यांनी विविध शाळांना दान म्हणून दिलेलं होतं.
७ जानेवारी १९५४ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना नागपूर येथे तत्कालीन प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत झाली.तेव्हापासून दर दोन वर्षाला संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन होते.सन १९६०ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाने महाराष्टात संघटनेच नामकरण झालं.
बाबासाहेबांनी १५ आॅगस्ट १९३६ रोजी ' *स्वतंत्र मजूर पक्षाची* ' स्थापना करीत असल्याची घोषणा केली. त्यांची या पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली, तर पक्षाचे *उपाध्यक्ष* म्हणून मोरेश्वर वासुदेव अर्थात *दादासाहेब दोंदे* यांची निवड करण्यात आली. त्यावरूनच बाबासाहेबांचे आणि दादासाहेबांचे संबंध किती घनिष्ठ होते याचा प्रत्यय येतो. स्वतंत्र मजूर पक्षाला १९३७ सालच्या मुंबई इलाख्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या 'थाॅट्स आॅन पाकिस्तान' या ग्रंथावर मुंबईतील हेमंत व्याख्यानमालेत वागळे हाॅलमध्ये १८ ते २० फेब्रुवारी १९४२ या तीन दिवशी परिसंवाद झाला. या तीनही दिवसातील परिसंवादाचे अध्यक्ष दादासाहेब दोंदे होते.
बाबासाहेब कायदेमंत्री असताना मुंबईतील एका भेटीदरम्यान त्यांनी दादासाहेबांना राष्ट्रीय कामगार आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी मुंबईमध्ये ' *पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस)* या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. संस्थेच्या पहिल्या कार्यकारी मंडळावर निस्पृह आणि विश्वासू असलेले दादासाहेब दोंदे यांची सचिव म्हणून निवड केली. बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा पीईएसच्या कार्यकारिणीची बैठक होई. या बैठकीला दादासाहेब न चुकता हजेरी लावत.
मास्तरकीच्या नोकरीवर त्यांचे सर्वात जास्त प्रेम होते. मास्तर या शब्दाची व्याख्या ते ' *मायेचे अस्तर पांघरणारा तो मास्तर* ' अशी करीत असत.
बासाहेबांनी आपला मुलगा यशवंत तथा भैय्यासाहेब यांस, दोंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. भट हायस्कूलमध्ये दाखल केलेलं होतं. आचार्य दोंदे सर, हे प्रभावी वक्ते होते. त्यांचे विवेचन चिंतनगर्भ असे. १९४२ साली डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला होता. त्या समारंभाचे अध्यक्षस्थान दोंदे सरांनी भुषविले होते. " *डॉ. आंबेडकरांचे संर्घशमय कार्य हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्वपुर्ण ठरते आहे* ." असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. १९४८ साली त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या सुविद्य सहचारिणी, सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ आर. एम. भट. हायस्कूलमध्ये घडवून आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुुंबईतील 'राजग्रुह' हे निवासस्थान त्यांच्या हजारो दुर्मिळ ग्रथांचे माहेरघर होतं. त्या ग्रंथालयातील पंचवीस हजार ग्रंथांची क्रमवार सूची तयार करण्यात, दोंदे सरांचा मोलाचा सहभाग राहिलेला होता.
१४ आँक्टोंबर १९५६ रोजी, बाबासाहेबांनी बुद्धधम्माची नागपुरात दिक्षा स्वीकारली. त्या धर्मांतराचे समर्थन व स्वागत करणारे पत्र, दोंंदे सरांंनी बाबासाहेेबांंना पाठविलेे होतेे.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. ७ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर आंदरांजली सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड, प्र. के. अत्रे आणि आचार्य दोंदे यांसह काही मोजक्याच धुरीणांची शोक प्रकट करणारी भाषणं, सदर सभेत झाली होती. त्यावेळी आचार्यांनी अत्यंत भावोत्कट असं मनोगत व्यक्त केलेलं होतं.
प्रिन्सिपाल मो. वा. दोंदे यांचे मुंबईत नभोवाणीवर बाबासाहेबांच्या वर भाषण झाले. ते 'नवशक्ति च्या ८ डिसेंबर १९५६ च्या अंकात दुसऱ्या पानावर प्रसिद्ध झाले.
प्राचार्य दोंदे यांनी गुरुवारी मुंबई आकाशवाणी केंद्रावर बाबासाहेबांना आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहाणारे भाषण केले होते.त्यात त्यांनी त्यांच्या धर्मांतराच्या तत्त्वज्ञानाची साधकबाधक विचारांची चर्चा केली होती.
१९५७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांत संयुक्त महाराष्ट्र समितीला दणदणीत यश मिळाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत १३१ जागा होत्या. त्यापैकी ७२ जागा समितीला आणि ५७ जागा काँग्रेसला मिळाल्या.
महापौरपदाच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार आचार्य दोंदे ७७ मते मिळवून विजयी झाले.
अशा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीच्या क्रुतीशील समर्थकाचे ७ ऑक्टोबर सन १९६४ला मुंबईत निधन झाले.
संदर्भ : चांगदेव भवानराव खैरमोडे,भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२
डाॅ.बाबासाहेब.आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी.- योगीराज बागुल